नुसते 'घर' असे उच्चारले तरी एक प्रकारची सुरक्षिततेची भावना जाणवते. पक्ष्यांमध्ये त्यांचा अभाव कसा असेल? अश्याच एका घरट्याची ही कहाणी...
आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे तीन घटक म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. पशु पक्ष्यांमध्ये ही वस्त्र वगळता इतर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. अन्न ते कसेही मिळवतात,पण निवारा याविषयी त्यांच्या ही काही कल्पना असतात. त्यानुसार योग्य जागा सापडली , की ते त्या ठिकाणी आपले घर बनवतात. पक्षी तरी याला अपवाद कसे असतील?
या घरटे संदर्भात सहज जाता जाता एक गमतीशीर माहिती आठवली. साधारणपणे नर व मादी मिळून घरट्यासाठी योग्य जागा शोधून घरटे बांधतात,पण गवळण पक्ष्यांमध्ये तसे नसते. नर गवळण पक्षी बया-मादीला आकृष्ट करण्यासाठी घरटे बांधतो. तिला ते प. संत पडले नाही तर दुसरे,नाहीतर तिसरे ....थोडक्यात वधूला 'घर पसंत, तर वर पसंत.'
नाचरा (fan tailed flycatcher spotted) पक्षीही दोन-तीन घरटी बांधून ठेवतो. फरक इतकाच असतो ,की इथे त्याला तिची संमती आधीच मिळाली असते. मग त्यांचे घरटे बांधणे सुरू होते. एखाद्या द्रोणासारखे दिसणारे हे घरटे जमिनीपासून चार-पाच फूट उंचीवर असते. एका वेळी दोन-तीन घरट्यांची कामे सुरू असतात. जे आवडते तिथे संसार सुरू होतो.न आवडलेली घरटी तशीच सोडून दिली जातात.
माझ्या घराच्या परिसरातच हे सगळे घडत होते, पण घडत होते ते तितकेसे साधे नव्हते. त्याला एक वेगळा 'अँगल ' लाभला होता. कोकिळा दुसऱ्याच्या घरट्यात अंडी घालते हे सर्वांनाच माहित आहे, ती कावळ्याच्या नव्हे, तर नाचरा, शिंजीर या छोट्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालते. त्यांच्या नकळत हे छोटे जीव आपल्या चौपट आकाराच्या पिलांचे पोषण करतात. यदाकदाचित कोकिळेला अंडी घालणे जमले नाही, तर ती या घरट्यांचा विध्वंस करते. त्यांचा संसार उधळून लावला.
.... याही वेळी कोकीळ पती पत्नीच्या नाचाऱ्याच्या घरट्याभोवती घिरट्या चालू होत्या. त्याच वेळी हिरव्या चाफ्याच्या दाट झाडात नाचाऱ्याच्या दुसऱ्या घराण्याची काम पूर्ण झाले होते. दोन्ही घरट्यात नारी बसला होता. अंडी नीट राहतील असा घरट्याचा आकार करत होती आणि एक दिवस हिरव्या चाफ्याचे घरट्यात ओळीने तीन दिवस तीन अंडी दिसली. ती अंडी उबवण्याचे काम सुरू होते, पण मधूनच कधीतरी ही दोघं त्या पहिल्या सोडून दिलेल्या घरट्यावर जाऊन बसत. शेपटी फुलवून शिळा घालत नाही करत. दरम्यान, कोकिळेच्या आक्रमक फेऱ्या चालू होत्या. असेच कधीतरी तीनपैकी दोन अंड्यातून एकाच दिवशी दोन पिले बाहेर आली. त्या दिवसानंतर या दोघांनीही दुसऱ्या घरट्याचा नाद सोडून दिला. पण पाठोपाठ कोकिळेला 'नाचऱ्या ' च्या या घरट्याची कल्पना आली व ते तिथपर्यंत पोचले. घरट्यात असलेलं तिसर अंड त्यांनी फोडून टाकले, पण किमान दोन पिले तर वाचली.
कोण शिकवत असेल हे या मुक्या प्राण्यांना? आपल्यापेक्षा बलाढ्य शत्रूशी झुंज घेताना अपार कष्ट करून एक नव्हे, दोन दोन घरटी बांधायची . एक त्याला दिसेल अशा ठिकाणी व दुसरे त्यापेक्षा अधिक सुरक्षित ठिकाणी. हुलकावणी देण्यासाठी दोन्ही घरट्यांचा वापर करायचा. अंडी मात्र सुरक्षित घरट्यात घालायची. कोण देतं त्यांना हे शिक्षण? पण खरेच अश्या शिक्षणाची त्यांना गरज असते का? बरे , कश्याबद्दलच त्यांची काही तक्रार नसते. आपल्यावर येऊ पाहणाऱ्या संकटाला सामोरं जायला ते सदोदित तयार असतात.
तसे नसते तर माझ्या घराच्या परिसरात राहणाऱ्या या "नाचरा" दांपत्याने नवीन घरटे बांधायला सुरुवात केली नसती.
Comentários