निसर्गाच्या आविष्कारापैकी एक म्हणजे फूल. फूल आवडत नाहीत असे म्हणणारा विरळाच. एखादा ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तीचा मान आपण पुष्पगुच्छ देऊन करतो. पण लौकिकार्थे नसला तरी काही फुलांचा मान मात्र माणसाने राखला आहे. साहित्य विशेषतः कवितारुपी च्या माध्यमाद्वारे एक प्रकारचे अमरत्व दिले आहेत, त्यातील एक फूल प्राजक्ताचे.
गुरुदेव रवींद्रनाथ यांची अंतिम इच्छा काय असावी- मृत्यूचा स्पर्श पारिजातकाच्या फुलासारखा नाजूक असावा तर ग्रीक कवी साफो म्हणतो की हे फूल देवांचे सौंदर्य वाढवते आणि त्याचा प्रेमाचा श्व़ासच!
बा. भ. बोरकरांची इच्छा पुनर्जन्म विषयी -
जरी पुन्हा यायचे या सत्य सुंदर जगी
प्राजक्ताच्या जाती जावे निसर्गाच्या जगी
कवी माधवांची किती सुंदर कल्पना पहा.
सौगंध श्वास सोडतो प्राजक्ताच्या कळ्या
लाजत लाजत हळूच उघडता नित नाजूक पाकळ्या
त्या इच्छांना पिऊन विजेचा चांद हर्ष निर्भर
होऊनिया बेभान नाचतो निळावंती च्या घरी !
रुबिया कार हिमांशु कुलकर्णी चे कल्पनाविष्कार पहा
चांदण्या हळुवार विझायला लागल्यात
बागेत अलगद उतरायला लागल्यात
नकळत शिरून प्राजक्ताच्या कुशीत
अंगणात टपटप यायला लागल्यात
पाऊस ज्यांचा पडतो , तो फक्त प्राजक्त फुलांचा ,भल्या सकाळी सुगंधाचं आवताण देणाऱ्या इंदिरा संतांनी हिऱ्या मोत्याची फुलं म्हणून संबोधले, तर मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या दांडील केशरी देहदंड म्हणून संबोधतात. या दांड्याने केशरी रंग कसा प्राप्त झाला ?
वसंत बापट-
एकदा एका देवाला गंध भूल पडली
पहाटेच्या दवात तिची पावले भिजली
प्राजक्ताचे देठ तिच्या पायाखाली आले
पायावरच्या मेंदीने कसे लालेलाल झाले.
आणि तेच कविवर्य प्राजक्त फुलांचा पाऊसाचा कसा उपयोग करून घेतात.
ओलेती पहाट शहराची लाट गळ्यात पश्मीना बाहू।
तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू।।
प्राजक्त फुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशील.
प्राजक्त या धरेवर कसे आले यासंबंधी लोककथा आहेत. कारण हे झाड देवतरू , म्हणजे इंद्राच्या बागेतील. बाकी चार झाडे म्हणजे हरीचंदन, कल्पतरू, मंदार व बुरास.
सूर्यनारायण रोज सकाळी आपल्या किरणांसोबत एक प्राजक्ताचे फूल कुंतीला पाठवत असे व हा नियम कधी चुकला नाही. एक दिवस खूप ढग आल्यामुळे सूर्यकिरण जमिनीवर पडले नाहीत, फूल मिळाले नाही म्हणून कुंतीने नाराजी अर्जुनाला सांगितले. त्याने सूर्याकडून पारिजातकाचे झाड आणले.
उत्तर प्रदेशात बाराबंकीपासून ४० किलोमीटरवर कितूर नावाचे गाव असून ते कुंतीने असल्याचे मानण्यात येते. तेथे कुंतेश्वर चे मंदिर आहे,त्याला लागून मोठे भुयार आहे. कुंतीचे ते शानदार असल्याचे मानण्यात येते. एक पुरातन पारिजातकाचा वृक्ष आहे. अर्जुनाने लावलेला हा वृक्ष अशी समजूत आहे.
यावर इंदिरा संत-
पृथ्वी निरागस फुल जीव सूर्याचा जडतो
हातातील पारिजात तिच्या भांगात माळतो
तेव्हापासून नित्यनियमाने उगवता सूर्य देतो
उभ्या पृथ्वीच्या हातात फूल प्राजक्त ठेवतो.
एका देशाची राजकन्या पारिजाता - आपल्या वडिलांबरोबर बागेत फिरत असताना सूर्यदेवाच्या दृष्टीस पडली, प्रथम दर्शनीच सूर्यदेव तिच्यावर मोहित होतो. आपली कवचकुंडले काढून मानव रुपात प्रकट होतो. ते तेजस्वी सुंदर रूप पाहून पारिजाता त्याच्यावर घालते, त्याचा अनुनय करतो त्याला वश होते.
पण एक दिवस चंचल वृत्तीच्या सूर्यदेवाला दुसरी रूपवती भेटते. तो तिच्या प्रेमात मश्गुल होतो. या प्रणयिनी ही गोष्ट कळते. सूर्यदेवाला अनेक विनवण्या करून निष्फळ ठरल्यानंतर नाईलाजाने मृत्यूचा आश्रय देण्याचे ठरवते. अब्रू तर गेलीच होती, पण प्रेम निधी नही हरवले होते. मोठ्ठी चिता रचून , सूर्यदेवाला स्मरून , मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून चितेत प्रवेश करते.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या राखेतून एक रोप उगवते व जोमाने वाढू लागले, पावसाळ्याच्या सुरुवातीला बहरू लागते. पण ती वृक्षरूपी प्रणयिनी आपले दुःख विसरू शकत नाही. रात्री बहरणारी, सुंगधाची उधळण करणारे हे मोती. पोवळ्याचे फूल सूर्योदयापूर्वी धरतीवर अश्रू ढाळत पडते, सूर्य वर येण्यापूर्वी प्रत्येक फूल पडून धरणी शुभ्र रक्त वर्णाने आच्छादून जाते. दिवसभर हे झाड रुक्ष, काळहीन , आसवणे वाटते, तर रात्री गत प्रेमाचे वैभव आठवत बहरत राहील. शुभ्र वर्ण प्रेमाच्या सुकुमार , शुचितेचे प्रतीक तर रक्तवर्ण हे प्रणयाचे व्यथेची आरक्तता दिसून येते ती देवरुपी गोल आश्रु बिंदूत !
कुसुमाग्रज लिहितात -
प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्पराज
वाऱ्यावर वाहती त्याचे दाटलेले श्वास
आणि माणिक मोत्याची पायाशी घालून बरसात
बसे संन्यस्त पारिजात.
अमृत प्राप्ती साठी देव - दानवांनी समुद्रमंथन केले. मंदर पर्वताची रवि तर सर्पराज वासुकी ची दोरी केली. त्यातून जी १४ आश्चर्ये प्राप्त झाली त्यातील एक पारिजातक.
नरकासुराचा वध करून कृष्ण स्वर्गात गेला असता, नारदाने प्राजक्ताचे फुल देऊन स्वागत केले. पृथ्वीवर परतल्यावर कृष्णाने हे फुल रुक्मिणीला दिले. सत्यभामेला हे वृत्त दासी करावी कळते, रुसून कृष्णाकडून हे झाड आणण्याचे वचन घेते.
नारदाने अगोदर कृष्णाला कल्पना दिली की काश्यपे आदितीचे प्रिय करण्यासाठी या वृक्षाची उत्पत्ती केली होती. तेव्हा तो तुला मिळणे दुरापास्त आहे.
शिकारी निमित्त करून कृष्ण रैवतक पर्वतावर जातो व हा वृक्ष नेण्याच्या इराद्याने इंद्राच्या बागेत घुसतो. इंद्र स्वाभाविकपणे चिडतो, तो कृष्णाबरोबर घनघोर युद्ध करतो . काश्यपाला हे कळल्यावर तो इंद्राची समजूत घालतो व हा वृक्ष कृष्णास देतो .
पुढे तर गंमतच होते. हा वृक्ष सत्यभामेच्या अंगणात लावला जातो, पण तो झुकून पुष्पवर्षाव मात्र रुक्मिणी का करतो . मात्र या सवती मत्सर पानांच्या वाट्याला मात्र रखरखीतपणा येतो.
या फुलाच्या सौरभ ची किमया पहा . अर्थात गुरुदेवांचे शब्द अश्विनात जेव्हा सकाळी वनांत दवबिंदूंनी ओल्या झालेल्या झुळकांबरोबर दरवळू लागतो फुलांचा सुवास , तेव्हा का न कळे आईचा विचार तरळू लागतो माझ्या मनात. कधी कधी आई त्याच फुलांची परडी आणत असावी. म्हणूनच पूजेचा गंध येतो , आईचा गंध होऊन.
पण तेच गुरुदेव रवींद्रनाथांचे मन प्रकटते-
एक शेफाली फूल , तुझ्या डोळ्यात दवबिंदू रुपी अश्रू का? तुझ्या सौरभातून तुला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे ?
हे फूल नाजूक आणि सुंदर ,फक्त देवांगनांसाठी बनले आहे.
(कुमारसंभव, सुलभ भाषांतर, डॉ.म. वि . आपटे)
देई नंदन पारिजातक उमेस हर अनुरागे
इंद्रपतीने नित्य सजावे ज्या कुसुमांच्या संगे
भाग्य असे ज्या तिला देखुनी सुर युवतिंनी
निजरमणाने बहुत दुषिले मनि विचलित होऊन
इंदुमती स्वयंवर याचे वर्णन (रघुवंश) - अज राजा विवाह मंडपात उंची आसनावर बसला होता. आपल्या तेजाने चमकत होता,जसा कल्पतरू पारिजात!
दुर्गा भागवतांनी ऋतुचक्रात गुंफलेलं पारिजातक . पारिजातकाच्या मोठ्या पोवळ्याच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू ,त्या फुलांच्या पायघड्यांवरुन पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद हे सर्व रूप-रंगांचे , गंधांचे लावण्यविभ्रमाचे जग!
या फुलाच्या रंग रूपाने, सौरभने कवी मंडळी मात्र भारावून गेली आहेत.
हिमांशु कुलकर्णी -
ओठात गीत अन् हातात हात
दरवळून आला श्वासात प्राजक्त.
तेच असलेल्या प्रियेला असण्याचे कारण विचारतात -
प्राजक्ताच्या फुलांचा उटणे लावून आलीस
मोगरीच्या दुधात तू न्हाऊन आली
भांगात तर भरला जास्वंद रंग
मग उगाच का अबोलीचा वसा घेऊन आलीस
त्यांचे भावूक मन बोलते -
अनावर पहाट आणि पेंगुळलेली रात्र,
प्राजक्ताच्या दवात भिजलेली रात्र.
रेव्हरंड ना.वा. टिळक -
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला.
मला अज्ञात असलेले कविवर्य-
चंद्रकला हासे तुला बघता बागेत
अशा उषःकाली चालले कसले हे संकेत?
तोच तारका त्या उडाल्या लागूनी वारा
या प्राजक्ताला तोच लटकला थवा.
चारोळ्यांमध्येही प्राजक्ताचा भरपूर वापर झाला आहे. चंद्रशेखर गोखले -
प्राजक्त फुलताना आपण पहाटेपर्यंत जागायचो,आठवते?
आपण त्या दिवसात किती खुळ्यासारख वागायचो.
पण काही दिवसानंतरची व्यथा -
तू माझ्या मनापर्यंत येतेस, पण देहापर्यंत पोचत नाहीस
जिथे मुक्याने प्राजक्त बहरला. तू कधी वेचित नाहीस?
यामागचे कारण -
कुंपणावर कुठेतरी प्राजक्त आणि कर्दळ
आणि घरात मात्र सगळीकडे निवडुंगाची वर्दळ
त्यांचे विमान प्राजक्ताची पण व्यथा जाणते.
झाडावरून जेव्हा प्राजक्त ओघळतो त्याचा काही आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला काही इजा होत नाही.
हे काही निसर्ग कवि- मंगेश पाडगावकर-
आनंदात पारिजातक, उधळीत बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल
वा. रा. कान्त -
शुभ्र पारिजातका बहर येत का
पुष्पांचा सफा पडेल भोवताली
(बहुतेक संजीवनी मराठे) कारण-
अंगणी आला वारा, चाहूल त्याची लागून
माझा पारिजातक थरारला
तर कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून-
शब्दां शब्दांच्या घाटातून ओसाडे भाव
प्राजक्त कळ्यांचा कोमल वर्षाव
प्राजक्ताच्या बहरातच हरवलेल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ इंदिरा संत-
ओला सतेज प्राजक्त ,खाली उभी मी बाहुली
चमकत्या शिरव्याने फुले गुंफून ढाळली
तर- असे ओंजळीत उतरलेले हे फूल
गंध सुंदर प्राजक्ताचे, सुकुमार आठवणींचे
चंद्रकलांवर माझा पारिजात रोवला
कर्णफुल कणांना पारिजात ओवला
गळ्यातील हार यासाठी पारिजातक गुंफला
त्याचा नाजूक सुवास तनामनात शिंपला
श्रावणाचा राजा पारिजातक. दीर्घकाव्य, देण्याचा मोह आवरत नाही-
प्राजक्ता रे पारिजातका! तू स्वर्गीचा पाहूणा
वर्षातून एकदा जुना होऊन भेटते
तुझे रुक्ष से जीवन येई फुलून- उठून
येतो सावळे आभार, तुला मागते कस्तुरी
काळया हिरव्या रंगाची मोडून मन हरी
तुझ्या लांब लांब फांद्या स्वागताची तोरणे
राणे अमोरसमोर, गाती श्रावणाचे गाणे
गर्द हिरव्या पाचवीमध्ये प्रसन्न श्रावण
मित्र जिवाचे सोबती , वारा पाऊस नी ऊन
आले ऊन आल्या धारा, आला वाराही खेळीया
झुले चांदणी त्याच्यावर, हिरे मोत्यांनी थैया!
आला समोर श्रावण बहरला स्नेहभाव
बहरला पारिजात करे फुलांचा वर्षाव
आली सूर्याची किरणे फुले स्वर्गीय झेलाया
आकाशातील इंद्रधनू फुल प्राजक्त पहाया.
दुसऱ्या शतकातील लिहिलेले हसत साई राजा बढे
राज्याची वाट बघणारी विरहिणी
येई जिवलग पहा रात्रीचा त्रितिय प्रहर संपला
असे सयांनो सांगू मजला
झोपा बाई खुशाल तुम्ही मुळीच जागू नका
बोलू लागला सुगंध मजसी फुलली शेफालिका
सासरेबुवांना जाग येऊ नये म्हणून अनुभव सिद्ध संदेश
भुईवर ची फुले वेच ग नको होऊ असत
वाजतील कंकणे बाई ग हलवू नको प्राजक्त
सखी सुचवते संकेताने शनेश्वर ते पाहून
प्रिया मीलनी रमता कुंजी शेतकऱ्याची सून.
जल क्रीडेसाठी लव शरयू नदी वर जल विहारासाठी गेला होता. त्यावेळी त्याला रामाने दिलेले जल कंकण निसटून नदीत पडले. सोडण्याचा बराच प्रयत्न झाला, पाणबुडे पण प्रयत्न करून थकले, कंकण काही सापडले नाही, कोणीतरी त्याला सांगितले की शरयू च्या डोहात सर्पराज कुमुद त्यांच्या बहिणीसोबत कुमुद्वती सोबत राहतात, त्यांच्या कडे हे कंकण असले पाहिजे, बऱ्याच विनवण्या करून सर्पराज बांधत नाहीत , लव अखेर गरुडास्त्र सज्ज करतो, तेव्हा मग सर्पराज एका हातात कंकण व दुसऱ्यात कुमुद्वतीला घेऊन जलपृष्ठावर येतात. झाडासारखा - पारिजातकाच्या - निमुळता भाग वर मोठ्ठा पसरलेला फणा - शुभ्र पाण्याचा फेस हे दृश्य प्राजक्ताच्या बहरलेल्या वृक्षाप्रमाणे दिसत होते.
या दीर्घ कथनाच्या सांगतेस गुरुदेव रवींद्रनाथांच्या पेक्षा दुसरा कोणता आधार . मात्र या ओळींचे उत्तर तुम्हीच शोधायचे आहे, अर्थ लावायचा आहे.
आज पहाटे अरुणवर्णी प्राजक्ताचे पुष्प हातात घेऊन तू आलास .तुझ्या हातातील प्राजक्ताने माझे स्वप्न गंधित झाले आणि कोपऱ्यातील वीणा अनाहत स्वरांनी निनादली .
Comments